कला आणि विज्ञान शाखेसाठी थेट प्रवेश   

पुणे : बारावी नंतरच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाला  सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी ऑनलाईन अर्ज, गुणवत्ता यादी यानुसार ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, त्या प्रक्रियेमुळे काही महाविद्यालयांमध्ये बी.ए. आणि बी.एस्सी.च्या प्रथम वर्षाच्या अनेक जागा रिक्त राहिल्या होत्या. ही पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा काही महाविद्यालयांनी गुणवत्ता यादी न लावता ‘अर्ज करा आणि थेट प्रवेश घ्या’ अशी पद्धत स्वीकारली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच शाळांबरोबरच महाविद्यालयांचे वर्गही लवकर सुरू होण्याची शक्यता आहेत.
 
गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. यंदा बारावीच्या परीक्षेचा निकालही मागील वर्षांच्या तुलनेत कमी लागला आहे. विशेषतः कला शाखेचा निकाल पाच टक्क्यांनी घटलेला आहे. बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठीही विद्यार्थी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर काही महाविद्यालयांनी ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्रवेश’ या तत्त्वानुसार प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसारच प्रवेश दिला जाणार आहे. बहुतांश महाविद्यालयांमध्ये इनहाऊस (स्वतःच्या महाविद्यालयातील बारावीतून आलेल्या) विद्यार्थ्यांसाठी आरक्षित जागा असतात. त्यामुळे उर्वरित जागा कमी आणि अर्ज अधिक असल्याने वाणिज्य शाखेत सहज प्रवेश मिळणार नाही, असे चित्र आहे.

Related Articles